राजकीय हेतूने सिद्धगिरी मठाची बदनामीचे षडयंत्र करणाऱ्यांवर कार्यवाही करा : पंचक्रोशीतील २५ गावातील ग्रामस्थांची मागणी

राजकीय हेतूने सिद्धगिरी मठाची बदनामीचे षडयंत्र करणाऱ्यांवर कार्यवाही करा : पंचक्रोशीतील २५ गावातील ग्रामस्थांची मागणी



कोल्हापूर ११ प्रमोद पाटील 

आपली स्वार्थी राजकीय पोळी भाजता येत नाही, या उद्वेगातून काही विघ्नसंतोषी लोक सिद्धगिरी मठाची बदनामी करताना वारंवार आढळत आहेत. ज्या घटनांचा मठाचा संबंध नाही त्यांचा संबंध जोडून केवळ मठाच्या बदनामीसाठी अहोरात्र काही मंडळी सुपारी घेतल्यासारखे मठाची बदनामी करत आहेत. यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता अधिक आहे म्हणून प्रशासनाचे याची वेळीच दखल घेवून अशा विघ्न संतोषी लोकांवर तात्काळ कार्यवाही करावी म्हणून आज कणेरी, कणेरीवाडी व कोगील बुद्रुक व खुर्द  सह पंचक्रोशीतील २५ गावातील शेकडो नागरिकांनी जिल्हा पोलीसप्रमुखांना निवेदन दिले. 


श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाला तब्बल १३५० वर्षांपेक्षा अधिक मोठी परंपरा आहे. मठाच्या या प्राचीनतेसोबत गेल्या दोन दशकात पर्यावरण, आरोग्य, कृषी, शिक्षण, ग्राम विकास, सेंद्रिय शेती, आपत्ती व्यवस्थापन आदी विषयांवर अनेक सामाजिक प्रकल्प राबवले आहेत जे आज देशाला आदर्श ठरत आहेत.यामुळे  राष्ट्रीय पटलावर सिद्धगिरी मठाचे नाव गौरवाने घेतले जात आहे. मठाच्या या कार्यावर काही द्वेष करणारी मंडळीना पोटशूळ उठत आहे, त्यामुळेच ते मठाला कसे बदनाम करता येईल याचा केवलवाना प्रयत्न नेहमी करताना दिसत आहेत. 


सिद्धगिरी मठ एक अध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक व्यासपीठ असल्याने याठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातील संमलेन, कार्यशाळा, उत्सव साजरे केले जातात. आध्यात्मिक व्यासपीठाचा एक भाग म्हणून २० मे रोजी विश्व हिंदू परिषदेने  सिद्धगिरी मठावर ‘संत संमेलन’ घेण्याची इच्छा प्रकट केली. त्यामुळे मठाने  संमेलन इथे घेण्यासाठी जागा व सेवा उपलब्ध करून दिली. यात कोल्हापुरातील सर्व संप्रदायाचे संत, महंत व धार्मिक अधिकारी सहभागी झाले होते व या संमेलनास जिल्ह्यातून उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. 


हे मठाचे कार्य काही समाजकंटक लोकांना आवडत नाही, त्यामुळे  सातत्याने धार्मिक कार्याला खीळ बसावी व समाजिक  तेढ निर्माण करण्यासाठी ते कार्यरत असतात. यातूनच १३ जून रोजी सिद्धगिरी मठावर मोर्चा काढणार अशी वल्गना काही लोक करत आहेत. यातून अशा लोकांना केवळ सिद्धगिरी मठाची बदनामी कशी होईल यात अधिक स्वारस्य असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. 


समाजातील असंख्य लोकांच्या भावना मठाच्या सोबत जोडलेल्या आहेत, त्यामुळे अशा तथाकथित मोर्चाला समाजातील सर्वच स्तरावरून प्रखर विरोध होण्याची शक्यता आहे. 


या पूर्वी या समाजकंटकानी मठाच्या बदनामीचे तीन वेळा अपयशी प्रयत्न केले आहेत. या संत संमेलनास समाजातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद सहन न झाल्यामुळे याविषयी हेतूपुरस्पर मठाची बदनामी करण्याच्या दृष्टीने काही मंडळी सक्रीय झाली आहेत. त्यात सतीश कांबळे, बाबा इंदुलकर, विजय देवणे, आर.के.पोवार, दिलीप पवार, बाबुराव कदम, चंद्रकांत यादव, व्यंकप्पा भोसले, इर्शाद फरास, सुनील देसाई  आदींच्या सहभाग आहे, त्यांच्या  विरोधात गुन्हा दाखल करून घ्यावा असे निवेदन कणेरी, कणेरीवाडी व कोगील सह मठाच्या परिसरातील २५ ते ३० गावातील नागरिकांनी जिल्हा पोलीसप्रमुखांना दिले. यावेळी शशिकांत खोत, निशिकांत पाटील, एम.डी.पाटील, दत्तात्रय पाटील, प्रमोद पाटील, वैभव पाटील, अनिल नाईक, सदाशिव स्वामी, सुरेश पाटील, सचिन पाटील, नाना नाईक, बाळासाहेब संकपाळ, युवराज पाटील, श्रीकांत गुडाळे, विष्णू चव्हाण, आबा पाटील, विजय मोरबाळे, बाळासो शेंगटे, पंडित गवळी, रणजीत पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.