दैनिक सकाळचे मुरगूड प्रतिनिधी प्रकाश तिराळे यांना मारहाण करणाऱ्या राजकीय गुंडांवर पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी- मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई)
कोल्हापूर १५ प्रमोद पाटील
मुरगुड येथे दै. सकाळमध्ये बातमी लावल्याच्या रागातून मुरगुडचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेखान जमादार व त्यांना सहकार्य करणाऱ्या आसिफखान उर्फ मॉन्टी आसदखान जमादार, संदीप अशोक सणगर यांनी दै. सकाळचे मुरगूड प्रतिनिधी प्रकाश तिराळे यांना मारहाण केली.
त्याचा तीव्र निषेध मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया करीत आहे. राजे खानच्या अरेरावी व मारहाणीचा तीव्र शब्दात निषेध करून संबंधित तिघांवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत तातडीने कडक कारवाई करावी. अशी जोरदार मागणी केली आहे. दरम्यान प्रकाश तिराळे यांनी दिलेल्या बातमीत कोणाच्याही नावाचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता. घडलेल्या घटनेचे वृत्तांकन करण्याचे काम पत्रकार प्रकाश तिराळे यांनी केले आहे. समाजात अनेक घटना घडत असतात. त्याची माहिती संकलीत करून कार्यालयात पोहोचविण्याचे काम पत्रकार करत असतात. त्यांना झालेली मारहाण म्हणजे पत्रकारिता आणि लोकशाहीवर केलेला हा हल्ला आहे. अशा शब्दात 'माई'च्या अध्यक्ष शीतल करदेकर यांनी संताप व्यक्त केला. 'पोलिसांनी महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम २०१७ च्या कलम ४ नुसार गुन्हा दाखल केला. या कलमानुसार तीन वर्षांची शिक्षा आणि ५०००० रुपयांचा दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. याचा तपास उपअधीक्षकांकडून होतो. अशीच कारवाई पोलिसांनी करावी अशी मागणी 'माई'चे सरचिटणीस डॉ. सुभाष सामंत यांनी केली आहे. यावेळी शेखर धोंगडे, राजू वाघमारे, अनिकेत बिराडे, मारुती गायकवाड आदी संघटनेचे पदधिकारी उपस्थित होते